गडहिंग्लज, ता. १३ : महात्मा गांधी यांचा विचार विद्यार्थ्यांनी समजून घेऊन त्यांचे आचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य कल्याणराव पुजारी यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात महात्मा गांधी मंचतर्फे आयोजित महात्मा गांधी विचारांचा जागर या उपक्रमाचा प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे अध्यक्षस्थानी होते.
श्री. पुजारी म्हणाले, 'अहिंसक सत्याग्रह हा स्वराज्य शक्तीचा मार्ग आहे. ३५ कोटी भारतीय जनतेचे आत्मबळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रित करण्याचे महान कार्य गांधीजींनी केले. आपल्या देशात ब्रिटिशांनी मिठावर लादलेला जुलमी कर हा भारतीय जनतेवर अन्याय करणारा आहे. जनतेची पिळवणूक करण्याच्या या अन्यायी धोरणाला विरोध करण्यासाठी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह पुढे स्वातंत्र्य चळवळीला खाऱ्याअर्थी बळ देणारा ठरला. महात्मा गांधी यांनी केलेल्या महान कार्याचा आदर्श आज जगासमोर आहे.'
प्राचार्य डॉ. एस. एस. कदम, प्रा. सुनील शिंत्रे यांची भाषणे झाली. शिवराजचे उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे यांनी प्रास्ताविकातून गांधी विचारांचा जागर करण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमास प्रा. पी.डी.पाटील, प्रा. आप्पासाहेब कमलाकर, प्रा. ईश्वर दावणे, प्रा. पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते. प्रा. आशा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संतोष पाटील यांनी आभार मानले.