समृद्धी महामार्गावरचा अपघात आणि २५ जणांचा मृत्यू ही घटना….” देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

KolhapurLive

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला बुलढाणा येथील पिंपळखुटा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात २५ जण ठार झाले आहेत. डिव्हायडरला धडकली. त्यानंतर बसचा टायर फुटून ती उलटली आणि बसला आग लागली. या आगीत होरपळून २५ प्रवासी ठार झाले आहेत. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट?
विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खासगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत ८ जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल.जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.

अपघतातील मृतदेहांची ओळख पटवण्याचं आव्हान आहे. कारण मृतदेह होरपळले आहेत. ही घटना अत्यंत गंभीर आहे. आम्ही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आत्ता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ड्रायव्हर वाचला आहे त्याची चौकशी सुरु आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं. बस जर पोलवर आदळली ही मानवी चूक असू शकते. पण आज त्यावर बोलणं योग्य होणार नाही. जो काही प्रकार घडलाय तो गंभीर आहे. आत्ता आम्ही घटना स्थळावर जातो आहोत. समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी उपाय योजना आपण करतो आहोत. स्मार्ट सिस्टिमही बसवण्याचं काम सुरु आहे. चालक यांना सूचना कशा देता येतील? ते टोल नाक्यावर आल्यानंतर त्यांना सूचना कशा देता येतील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला होता तेव्हा अपघात वाढले होते. नेमून दिलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने चालक गाडी चालवतात अशा गोष्टींमुळे या घटना घडतात. त्यामुळे प्रबोधन करणं आवश्यक आहे तेदेखील करण्याचा प्रयत्न आमचा आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं.