राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप करत याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे पडसाद उमटत असतानाच आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय समाजमाध्यमावर जाहीर केला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राजीनामा देऊ नये अशी समजूत काढली. तसेच दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा असून त्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले. तसेच या प्रकरणात षडय़ंत्र असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. असं असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या प्रकरणामध्ये पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा दाखला देत त्यावेळी देशपांडेंना महाविकास आघाडी सरकारने खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं होतं असा आरोप मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीटरवरुन केला आहे. अमेय खोपकर यांनी आव्हाड यांच्यासंदर्भातील प्रकरण हे विनयभंगाच्या चौकटीत बसलं नाही तर त्यांनी त्या महिलेला धक्का दिल्याचं व्हिडीओत दिसत असल्याचंही आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
आमच्या संदीप देशपांडेंनी अजिबात धक्का दिला नव्हता. प्रसारमाध्यमांच्या व्हिडीओमध्ये ते दिसत असूनही धादांत खोटा आरोप केला होता. खोट्या गुन्ह्यात (?) अडकवला त्याला महाविकास आघाडीने. कालची घटना विनयभंग नसावा कदाचित पण आव्हाडांनी धक्का मात्र दिलेला स्पष्ट दिसतंय. आता सर्वांची थोबाडं गप्प का?” असा सवाल खोपकर यांनी विचारला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये भोंग्याच्या मुद्द्यांवरुन मार्च महिन्यात सुरु केलेल्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दादरमधील शिवाजीपार्कजवळ संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील दादरमधील शिवाजीपार्कजवळच राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास राज ठाकरेंची भेट घेऊन शिवतिर्थबाहेर पडलेले मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे पत्रकारांशी संवाद साधू लागले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपल्याला प्रसारमाध्यमांशी बोलू द्या आपण सहकार्य करु असं मनसे नेत्यांनी सांगितलं.