कसा झाला अपघात? कारण काय? रेल्वे विभागाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

KolhapurLive


ओडिशातल्या बालासोरमध्ये शुक्रवारी रात्री भीषण रेल्वे अपघात झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १,००० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला? अपघाताची कारणं काय? तसेच या दुर्घटनेला कोण-कोण जबाबदार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दुर्घटनेचा तपास पूर्ण झाला असून दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या लोकांवर लवकरच कारवाई केली जाईल असं म्हटलं जात आहे. या अपघाताबाबत प्रत्येकजण आपापल्या परीने तर्क-वितर्क लावत असताना रेल्वे विभागाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला

रेल्वे विभागाने पत्रकार परिषदेत सांगितलं की, बहनगा रेल्वेस्थानकावर एकूण चार लाईन्स (रेल्वे मार्ग) आहेत. त्यापैकी मधल्या दोन लाईन्स आहेत ज्यावर कोणतीही रेल्वे थांबत नाही. बहनगा रेल्वेस्थानकावर न थांबता पुढे जाणाऱ्या रेल्वे या दोन लाईन्सवरून ये-जा करतात. तर दोन बाजूला असणाऱ्या दोन लाईन्स या बहनगा रेल्वेस्थानकावर थांबणाऱ्या रेल्वेंसाठी आहेत. यांना लूप लाईन्स म्हटलं जातं.

प्राथमिक माहितीनुसार सिग्नलमध्ये काहीतरी त्रुटी होत्या. परंतु ही केवळ प्राथमिक माहिती आहे. तपासाअंती खरं कारण समोर येईल. आम्ही सध्या चौकशी अहवालाची वाट पाहत असल्याचं रेल्वे विभागाने सांगितलं. तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्घटना केवळ कोरोमंडल एक्सप्रेसची झाली आहे. केवळ एकच ट्रेन क्षतीग्रस्त झाली. कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला जाऊन धडकली. त्या गाडीच्या इंजिनसह काही डबे मालगाडीवर चढले. ट्रेन पूर्ण वेगात होती. तर मालगाडी खूप वजनदार होती. त्यामुळे मालगाडी जागची हलली नाही. उलट प्रवाशांना घेऊन जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीवर चढली.