दरम्यान, विरोधकांना त्रास देण्यासाठी भाजपा केंत्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुळात केंद्रीय यंत्रणा असतील अथवा राज्याच्या यंत्रणा असतील, त्या त्यांचं काम करत असतात. त्यांच्याकडे काही संशयास्पद माहिती असेल, अथवा एखादं प्रकरण असेल म्हणून त्यांनी पाटील यांना चौकशीसाठी बोलावलं असेल. जर पाटलांचा या खटल्याशी (आयएल अँड एफएस) काही संबंध नसेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही.
प्रकरण काय?
आयएल अँड एफएसवर कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. ईडीने याप्रकरणी आयएल अँड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गेल्या आठवड्यात शोध मोहिम राबवली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती. यात आता जयंत पाटलांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती.