ऐतिहासिक चित्रपटांसाठी इतिहासकारांची समिती नेमावी”, संभाजीराजेंची मागणी; म्हणाले, “इतिहासाची मोडतोड करून आज…”

KolhapurLive


मागील काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वाद सुरू आहे. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. दरम्यान, आता ऐतिहासिक चित्रपटांसाठी राज्य सरकारने राज्यपातळीवर इतिहासकारांची समिती नेमावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

इतिहासाची मोडतोड करून प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटाला माझा विरोध आहे. ऐतिहासिक चित्रपट यायलाच हवेत, याबाबत दुमत नाही. मात्र, आज अनेक चित्रपट येत आहेत, ज्यात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असल्याचे सिद्ध झाले आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजी राजे यांनी दिली. “आज जो इतिहास आपण दाखवू पुढची पिढी तोच इतिहास घेऊन पुढे जाईल”, असेही ते म्हणाले.

हरहर महादेव चित्रपटाला सेंन्सर बोर्डाची परवानगी मिळाली आहे. मात्र, सेंन्सर बोर्ड हे दिल्लीत बसले आहे. या बोर्डात नेमके कोण इतिहासकार आहेत, माहिती नाही. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांसाठी राज्य सरकारने राज्यपातळीवर इतिहासकारांची समिती नेमावी. चित्रपटांची पहिली स्क्रिनींग महाराष्ट्रात करून पुढे ते सेंन्सर बोर्डाच्या परवानगीसाठी दिल्लीला पाठवावे”, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहीणार असल्याचेही ते म्हणाले.